नवी मुंबई (प्रतिनिधी)
नवी मुंबईच्या सांस्कृतिक व साहित्यिक वर्तुळात नुकताच एका
भव्य आणि दिमाखदार साहित्य सोहळ्याचा अध्याय पार पडला. रंगधनु प्रकाशन आणि समाजभूषण
उत्तमराव तरकसे सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान (आंबेजोगाई) यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित या सोहळ्यात,प्रसिद्ध लेखक गजानन म्हात्रे लिखित 'आऊशी गोष्ट' या
आगरी बोली भाषेतील बहुचर्चित कथासंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन
करण्यात आले.याच मंचावर,ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव तरकसे यांच्या राज्यभरात गाजत
असलेल्या 'करपली भाकर' या कथासंग्रहानेही उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.या
दिमाखदार सोहळ्याला साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला
मिळाली.प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध समीक्षक
डॉ.बाळासाहेब लबडे,

नामवंत लेखिका सौ.कौमुदी गोडबोले,प्रा.प्रतिभा सराफ, मुंबईच्या
एन.आर.भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत,आणि महाराष्ट्र शासनाच्या
'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण'पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक,कवी,
विचारवंत व 'करपली भाकर'कार उत्तमराव दासू तरकसे असरडोहकर प्रामुख्याने उपस्थित
होते.या सर्व मान्यवरांच्या हस्ते 'आऊशी गोष्ट'या पुस्तकाचे रीतसर प्रकाशन करण्यात
आले.आगरी बोलीतील साहित्य मुख्य प्रवाहात आणण्याच्या गजानन म्हात्रे यांच्या या
प्रयत्नांचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
'करपली भाकर'ची
मोहोर आणि दोन
दिग्गजांची भेट
----------------
कार्यक्रमात एक अत्यंत हृद्य आणि लक्षवेधी क्षण
पाहायला मिळाला.तो म्हणजे,समाजभूषण उत्तमराव तरकसे यांनी आपला गाजलेला'करपली
भाकर'हा कथासंग्रह ज्येष्ठ समीक्षक डॉ.बाळासाहेब लबडे यांना सस्नेह भेट देऊन
त्यांचा यथोचित सन्मान केला.'करपली भाकर' या
कथासंग्रहाने साहित्य विश्वात आपले एक वेगळे वलय निर्माण केले आहे.विशेष
म्हणजे,महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेतील वर्ग १ आणि वर्ग २ च्या
अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था 'यशदा' आणि पुणे महानगरपालिकेच्या
'मराठी भाषा संवर्धन विभागा'च्या वतीने या कथासंग्रहाला 'उत्कृष्ट साहित्य कलाकृती
२०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे.एका दर्जेदार
साहित्यकृतीची देवाणघेवाण दोन दिग्गजांमध्ये होताना पाहणे,हा उपस्थितांसाठी एक सुखद
आणि प्रेरणादायी अनुभव होता.एकाच मंचावर दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती आणि उत्तम
साहित्यकृतींचा संगम यामुळे या कार्यक्रमाला रसिक वाचकांनी अलोट गर्दी केली होती.
साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाचे सभागृह पूर्णपणे
'हाऊसफुल्ल' झाले होते.या सोहळ्याचे प्रास्ताविक आणि उपस्थित सर्व प्रमुख
पाहुण्यांचे स्वागत सत्कारमूर्ती लेखक गजानन म्हात्रे यांनी केले.कार्यक्रमाच्या
शेवटी त्यांनीच सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. एका अत्यंत भारावलेल्या आणि
साहित्यिक ऊर्जेने परिपूर्ण अशा वातावरणात या संस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.
----------------
0 टिप्पण्या