
आष्टी (प्रतिनिधी)
समाजातील वास्तवाशी नाळ जोडून,सामाजिक संवेदना जागृत ठेवून नवोदित लेखकांनी कथा व कविता लिहिल्या पाहिजेत.सकस साहित्यनिर्मितीसाठी व्यापक वाचन,सूक्ष्म निरीक्षण,सभोवतालच्या परिस्थितीचा डोळस विचार अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य आणि जिजामाता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कथा-काव्य लेखन कार्यशाळा व काव्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ.अशोकराव ढगे होते.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे,मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा.डॉ.नारायण काळे,शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी,उपप्राचार्य डॉ.संभाजी काळे, ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत,बाळासाहेब आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोककवी दिगंबर गोंधळी यांनी संबळ वादनातून वातावरण निर्मिती करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रस्ताविक नेवासा तालुका शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ. किशोर धनवटे यांनी केले.कथालेखना विषयी मार्गदर्शन करताना भाऊसाहेब सावंत म्हणाले की,अस्सल कथाबीज आपल्या ग्रामीण मातीतच दडलेले असते. निरीक्षणशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्या बळावरच प्रभावी कथा घडतात.मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या कथा वाचकांच्या हृदयाला भिडतात.
काव्यलेखनाचे तंत्र स्पष्ट करताना प्राचार्य डॉ. लांडगे यांनी नवोदित कवी-लेखकांना विचारप्रवृत्त करणे आणि त्यांना सातत्याने लेखनाकडे वळविणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कृषीशास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी जगाच्या गतिमान प्रवाहात समाधान व आनंदी जीवनासाठी मराठी साहित्यनिर्मितीची गरज अधोरेखित केली.आपण जे पाहतो,अनुभवतो त्याचे ज्वलंत शब्दांकन म्हणजेच जिवंत साहित्य असे ते म्हणाले.
या कार्यशाळेत ३२ नवोदित कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.सहभागी कवी व कथालेखकांना प्रमाणपत्रे व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मोहिनी साठे व प्रा. पोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले.काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी बाळासाहेब कोठुळे यांनी केले.आत्माराम शेवाळे,दिगंबर गोंधळी,डॉ. बेनझीर शेख, किरण वैद्य,संजय चव्हाण,पांडुरंग रोडगे,कारभारी देव्हारे,राणी सावंत,प्रा.पांडुरंग देशमुख,विठ्ठल सोनवणे,प्रा.तेजल सोनवणे,ऋषिकेश राजगुरू,आनंदा साळवे,कविता अडागळे आदी कवींनी काव्यरचना सादर केल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक पाटील,प्रा.डॉ.काकासाहेब लांडे,प्रा.डॉ.संभाजी तनपुरे,प्रा.पल्लवी मोट,श्रद्धा कोलते, वैष्णवी गांगुर्डे,कोमल शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या