
आष्टी (प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
संलग्नित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय,हाळगाव येथील
चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांनी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे पर्यावरण जनजागृती
व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून
युवा शास्त्रज्ञ, जैवविविधता संशोधक व वन्यजीव छायाचित्रकार रणजित रावसाहेब राऊत
यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले. “निसर्गाचा ऱ्हास हा मानवी जीवनासाठी
गंभीर संकट निर्माण करतो आहे. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची
गरज आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधतेच्या समतोलाबद्दल आणि
पारंपरिक देशी वृक्षांच्या लागवडीचे फायदे सांगितले. कार्यक्रमात पोलीस पाटील श्री.
योगिनाथ जायभाय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी कन्यांनी गावात
जनजागृती रॅली काढून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला. यानंतर शाळा परिसर व
गावठाणात जांभूळ, आवळा, कांचन, बहावा यांसारख्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात
आले.कार्यक्रमाचे आयोजन कृषी कन्या कु.नम्रता कदम,कु.अंजली गायवळ, कु. आरती
गायकवाड, कु.पायल इंगळे, कु.अनुजा जाधव व कु. गायत्री जाधव यांनी केले.
ग्रामस्थांनी कृषी कन्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले असून अशा उपक्रमांमुळे पर्यावरण
संवर्धनासाठी ग्रामीण भागात सकारात्मक चळवळ उभी राहणार असल्याचे मत उपस्थितांनी
व्यक्त केले.
0 टिप्पण्या