
आष्टी (प्रतिनिधी)
अमूल्य किंमतीचा हा नरदेह कोटी रुपये खर्च करूनसुद्धा पुन्हा
प्राप्त होत नाही. जमीन, गेलेले धन हे पुन्हा मिळवता येते पण एकदा शरीर गेलं की
पुन्हा शरीर मिळत नाही म्हणून या शरीराकडून भगवंताचे नामस्मरण करुन घेतले
पाहिजे.अनंत जन्माच्या पुण्याईने हा देह आपल्याला प्राप्त होतो. काहींना नरदेह
मिळाला नाही त्याचे महत्त्वही कळालेले नाही, काहींना नरदेह मिळाला त्याचं महत्त्वही
कळालं. काहींना नरदेह मिळाला नाही परंतु त्याचे महत्त्व कळालं आणि आपण संसारी जीव
असे आहोत आपल्याला नरदेह प्राप्त झाला.मिळाला परंतु नरदेहाचं महत्त्व आपल्याला
कळलेलं नाही म्हणून नको त्या विषयाकडे जीवाची धाव आहे.साधु संतांच्या सहवासामध्ये
गेल्यानंतर या जीवाला मी कोण आहे ? मी कुठून आलोय? मला कोठे जायचे ? याची जाणीव संत
करून देत असतात.संत कृपेने व संत सहवासाशिवाय खरे ज्ञान मिळत नाही. संत सहवासाने
ब्रम्हज्ञान प्राप्त होते असे प्रतिपादन ह.भ.प.सुरेखाताई मेटे महाराज यांनी केले.
आष्टी येथील मनसे नेते कैलास दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक
अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पंचदिनी किर्तन
सप्ताहात किर्तन प्रसंगी ह.भ.प. सुरेखाताई मेटे महाराज बोलत होत्या. यावेळी रविंद्र
तवले,शिवदास केरुळकर,लाला महाराज राक्षे, उत्तम महाराज धोंडे, नानासाहेब तवले,
सुरेश डोमकावळे, किसन महाराज जगताप,कैलास दरेकर आदि मान्यवर उपस्थित
होते.ह.भ.प.सुरेखाताई मेटे महाराज म्हणाल्या की, पारमार्थिक जीवनात उन्नती करायची
असेल तर जीवनात भक्ती,ज्ञान आणि वैराग्याची गरज आहे.भक्ती, ज्ञान,वैराग्याची
व्याख्या सांगताना तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सुत्रात्मक भक्ती म्हणजे
नमन,वैराग्य म्हणजे त्याग आणि ज्ञान म्हणजे ब्रम्हीभोग याची परिणीती ब्रम्हतनू झाली
पाहिजे. पारमार्थिक क्षेत्रात वाटचाल करताना एकतर वेदाच्या मागे गेले पाहिजे अथवा
संताच्या मागे गेले पाहिजे तरच परमात्म स्वरुपाची प्राप्ती करून घेता येते.मनाच्या
मागे जाण्यात मानवाची अधोगती आहे.दया क्षमा शांती तेथे देवाची वसती म्हणजे
ज्यांच्या ठिकाणी दया,क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती
असते.तो देह देवाचे घर असते.देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या
स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे.म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय
दुसरे काहीच दिसत नाही म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया,क्षमा, शांती या
गुणांचा अंगीकार करावा असेही उपदेश केला. निंदा,द्वेष ज्या अभिमानाच्या संगतीने
घडतात त्या अभिमाला जाळून टाका.गर्व,अहंकार, अभिमान सोडुन द्या.नामचिंतनाने अहंकार
नष्ट होत असतो.याकरीता हरिनाम घ्यावे असे ह.भ.प.मेटेताई महाराज यांनी सांगितले.
-------------------
0 टिप्पण्या