
आष्टी (प्रतिनिधी)
संस्कृती,शेती,शेतकरी,प्रेम, शिक्षण,उद्योग आदीसह विविध विषयाला
स्पर्श करत.मानवी जीवनाच्या विविध अंगाने संवेदनशील मनाच्या कप्प्यातून विविध
कांगोरे व्यक्त होत प्रतिभाशाली शब्दप्रभूंनी कवी संमेलनाच्या माध्यमातून रसिकांची
भूक भागवली! निमित्त होते महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय
महासंघाच्या भंडारा शाखेच्यावतीने आयोजित ऑनलाईन कवी संमेलनाचे. रविवारी ऑनलाईन कवी
संमेलनाला भंडारा येथून राज्यसचिव प्रा.बाळासाहेब माने यांच्या उद्घाटनाने आणि
सेवानिवृत्त प्राचार्य अमृत महोतुरे यांच्या अध्यक्ष स्थानावरून आणि गोपाल
मापारींच्या उपस्थितीमध्ये या कवी संमेलनाला बहारदारपणे सुरुवात झाली.कवी
प्रा.नितीन वरणकर यांनी सद्यस्थितीतील मुलामुलींच्या आणि त्यांच्या आई-वडिलांच्या
भूमिकेवर भाष्य करत विनोदातून भिषण वास्तवता अधोरेखित केली. "मी तिला पाहून म्हटले
ऊ, ती म्हटली हू, बाप म्हटला यु हू!" बीड जिल्ह्याची गुणी कवयित्री प्रा.कावेरी
खुरणे यांनी जात एक संस्कृती होती, शेतीमातीच्या कविता आणि शेतकरी पुत्र या
अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला हात घालत कवितेतून आपला विचार सैल केला.कवी
गोपाल मापारी,प्रा.ओमप्रकाश ढोरे, आदींनी कवींनी संमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेत कवी
संमेलनाची रंगत वाढवली.या ऑनलाइन कवी संमेलनाला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ
महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा.सुनिल डिसले,कार्याध्यक्ष
प्रा. संपत गर्जे, डॉ. ज्ञानेश हटवार, संतोष भाकरे, प्रा. शंकर अंकुश, डॉ. अंजना
खताळ, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, सेवानिवृत्त प्राचार्य धर्मराज काळे, डॉ. निलेश
आमले आदींची उपस्थिती होती.कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.संजय लेनगुरे
यांनी केले. प्रस्ताविक प्रा. जितेंद्र टिचकुले तर प्रा.प्रियंका बोपचे यांनी आभार
मानले. चौकट -------- "कविता या अंतर्मनाचा वेध घेतात; किंबहुना मानवी व्यवस्थेमधील
विविध समस्या, प्रश्न आणि दाहकता यावर सडेतोड शब्दातून भाष्य करतात.दुःख,
दैन्य,दारिद्र्य वेशीवर टांगून समतोल समाज रचनेचा प्रयत्न करतात.या अनुषंगाने
भंडारा शाखेने आयोजिलेले कवी संमेलन सामाजिक बांधिलकीचा पर्याय आहे!" असे कौतुक बीड
येथुन महासंघाचे प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे, प्रा.डॉ.अशोक देवगुडे, आणि
प्रा.बिभिषण चाटे यांनी केले आहे. ------------------------------
0 टिप्पण्या