
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यामध्ये आठवडाभरापासुन दिवसापासून दररोज पाऊस पडत
आहे. दररोज ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोग पडलेला आहे. पिकावर बुरशी
व कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ फवारणी करून घेण्याचे आवाहन
आष्टीचे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी केले आहे. गुरुवारी कडा परिसरात
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली असता उडीद पिकावर खोडमाशी व कीटकांचा
प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. कापसावर थ्रिप्स मोठ्या प्रमाणात असल्याने
कापसावर रस शोषककिडे ही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत.तुरीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात
ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आष्टी
तालुक्यामध्ये यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या मोठ्या
प्रमाणात झाल्या आहेत.आष्टी तालुक्यामध्ये ९८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली
आहे.त्यामध्ये प्रामुख्याने उडीद या पिकाचा समावेश आहे. कापूस, बाजरी ,तूर,
मूग,मका, सोयाबीन आदि पिकांची ही यावर्षी वेळेवर पेरणी झाल्याने पिके चांगली आहेत
परंतु गेल्या दहा दिवसापासून आष्टी तालुक्यामध्ये सतत रिमझिम व मोठा पाऊस पडत आहे.
त्याचबरोबर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकावर बुरशी व कीटकांचा प्रादुर्भाव
मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फवारणी करून घ्यावी व
आपल्या पिकाचे संरक्षण करावे.प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांच्याशी
संपर्क करून पिकाच्या परिस्थितीनुसार औषधाची फवारणी करावी असे आवाहन कृषी आधिकारी
गोरख तरटे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या