आष्टी (प्रतिनिधी)
सध्याच्या युगामध्ये जेव्हा संपत्ती
येते तेव्हा दया नसते,पैसा जास्त झाला की प्रेम कमी होते.जिव्हाळा कमी होतो.आपुलकी
नाहीशी होते आणि मनुष्यामध्ये घमेंड निर्माण होते.मात्र संपत्तीला दयेची जोड
मिळाल्यास संपत्ती आणि दया एकत्र आल्यास माणूस देव झाल्याशिवाय राहणार नाही असे
प्रतिपादन नामवंत कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर
यांनी केले.आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रेणुकामाता मंदिर परिसरामध्ये कीर्तन
सेवा देताना ते बोलत होते.आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस आणि सागर धस या
चिरंजीवांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका उद्योग समूहाच्यावतीने या कीर्तन सेवेचे
आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर ,दिलीप गोरे,
माजी सभापती देवीदास धस,युवानेते जयदत्त धस,सागर धस,खंडुदादा जाधव,अशोक मुळे,सरपंच
तात्यासाहेब शिंदे,उपसरपंच सतीष पोकळे ,प्रविण वारे,माजी सरपंच बन्सीभाऊ पोकळे
,विक्रम पोकळे ,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,जालींदर नरवडे,किरण महाराज
शेटे,संजय महाराज हजारे ,ओम महाराज नन्नवरे,मारुतीमामा पोकळे,आदि सामाजिक ,
राजकीय,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ह.भ.प.इंदुरीकर
महाराज म्हणाले की,देव आहे असे म्हणतात त्यांनी देखील देव पाहिलेला नाही आणि जे देव
नाही म्हणतात त्यांचा प्रश्न निर्माण होत नाही.देव पाहता येत नाही.देव मोजता येत
नाही अध्यात्मिक गुरूंनी अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी देखील देव पाहिल्याचे
म्हटलेले नाही मात्र दुधाचे लोण्यात रूपांतर होते,लाकडाचे अग्नीमध्ये रूपांतर
होते,उसामध्ये साखरेची निर्मिती होते. ही प्रक्रिया मानवी नजरेला दिसत नाही परंतु
प्रक्रिया मात्र नक्की होते तसेच देव दिसत नाही पण अस्तित्वात आहे आणि खरोखरच देव
पाहायचा असेल तर संतांना शरण जावे लागेल असे सांगून सद्यस्थितीतील सामाजिक
परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की,आज वीस वर्षाच्या मुलाचे लिव्हर दारू पिऊन खराब
होत आहे.२५ वर्षाच्या मुलाला डायलिसिस करावे लागत आहे. ही परिस्थिती का निर्माण
झाली याचा गांभीर्याने विचार करा असे कळकळीचे आवाहन करून ते म्हणाले की,आपण समाजात
पांढरे कपडे घालून,दाढी मिशा काढून फिरतो म्हणजे फार चांगले आहोत असे नाही दारूमुळे
समाजाचा विनाश होत चाललेला आहे. याचा विचार करावा कोणीतरी खरे सांगावे लागेल, खरे
बोलले नाही तर धर्म टिकणार नाही असा इशारा देऊन पुढे म्हणाले की, नोकर वर्गाची
दयनीय अवस्था असून शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या ४० टक्के लोक वृद्धाश्रमात आहेत
कारण ते कधी कोणाशी चांगले वागले नाहीत, बोलले नाहीत मात्र शेतकरी हा एकमेव घटक असा
आहे की, त्याचा बाप वृद्धाश्रमात गेलेला नाही.आजही ग्रामीण भागामध्ये सुनेचा आणि
सासऱ्याचं पटत नसलं तरी सून शिव्या देऊन का होईना परंतु त्याला भाकरी देत आहे.सासरा
देखील म्हणतो की,




सून थोडी रागीट आहे पण भाकरी मिळत असल्याने मी समाधानी आहे असे
सांगत असतो.माणसाने तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे
अंगातली ताकद,दुसरी खिशातले पैसे आणि तिसरी तुमच्या जवळ असलेल्या वेळ वाया घालू
नका. लक्ष्मी जपून वापरा कारण हीच लक्ष्मी एकाच दिवसात रंकाचा राव करते आणि रावाचा
रंक करते.पैसा सांभाळायला नम्रता लागते आणि ज्या ठिकाणी नम्रता असते तिथेच लक्ष्मी
नांदत असते माज आला की, लक्ष्मी निघून गेलीच समजा, लक्ष्मीचा माज केला की, तुमचा
कार्यक्रम झालाच म्हणून समजा. आपण फार चांगले आहोत समाजात आपल्याला फार मान आहे असे
अजिबात समजू नका कारण तुम्ही सीझन पुरते आहात तुमचा केवळ वापर होत असतो काही लोक
बापाला उचलून आपटतात तर तुमची काय गत आहे. तुम्ही म्हणता माझ्यावर लोकांचे फार
प्रेम आहे लोक आपल्याला फार मानतात परंतु हे मानत बिनत नसतात. हे केवळ तुमच्या
तोंडावर तुमची स्तुती करतात आणि तुमच्या पाठीमागे तुमची टिंगल करत असतात याचे भान
ठेवा असे सांगत अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना लोक विसरले.. प्रसिद्ध
कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी सांप्रदायाची ताकद आणि सांप्रदायाची श्रीमंती
दाखवून दिली त्यांच्या रामकृष्ण हरीला राक्षसी माणूस सुद्धा डुलायचा. गानसम्राज्ञी
लता मंगेशकर यांना देखील समाज एका वर्षात विसरला आहे याची जाणीव ठेवून आपली वागणूक
बदला. समाजातील दारू पिण्याचे व्यसन कमी झाले पाहिजे कारण तरुणपणी अकाली मरण
आल्यानंतर आई-बाबांनी आणि पत्नीने मुलांनी कशासाठी जगायचे ? असा प्रश्न निर्माण
होऊन यातून फार मोठी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे लोकांनी आपली ताकद चांगल्या
कामाला वापरावी गाईची,काळी आई असलेल्या जमिनीची आणि घरातील आईची सेवा ही
सर्वश्रेष्ठ सेवा आहे असे सांगून सामाजिक स्थिती अशी आहे की,आपले शत्रू आपलेच असतात
घरातले असतात,भावकीतले असतात आणि गावातले असतात.ते जिवंतपणे जगू देत नाहीत आणि
मेल्यानंतर त्यांच्याशिवाय जाता येत नाही अशी विदारक परिस्थिती असल्यामुळे चांगल्या
कामाला वेळ द्या चांगल्या कामात पैसा खर्च करा अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे,
ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे, नामापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे नामस्मरणामध्ये
फार मोठी ताकद आहे असे ह.भ.प. इंदुरीकर महिराज यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या