उत्तम बोडखे,आष्टी.
शेतीसुध्दा कष्टाने,निष्ठेने, तंत्र आणि यंत्राचे सहाय्याने केली तर ती किफायतशीर ठरते.शेतीमध्ये नुकसान होते अशी तक्रार आपण
नेहमी ऐकतो परंतु नियोजन पुर्वक शेती व्यवसाय अथवा फळबाग
शेती चांगले उत्पन्न आणि समाधान देऊन जाते हेही तितकेच खरे
आहे.आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द येथील सुनील सत्यवान ढोबळे
या इलेक्ट्रिकल इंजिनिअरने ५० हजार रुपये महिन्याची नौकरी
सोडून गावी आला. येऊन केशर आंबा बाग तयार केली.मुरमाड
आणि खडकाळ जमिनीत केशर आंब्याची बाग फुलवली..
पुणे शहरात इंजिनअर म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने शेती यशस्वी
करुन दाखवली. लाखोंचे पॅकेज सोडून गावी येऊन त्याने शेती सुरु केली.आता शेतीत नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे.
यामुळे त्याची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत आहे.आष्टी
तालुक्यातील शेरी खुर्द येथील माजी सरपंच सत्यवान ढोबळे यांच्या
मुलाने पुणे येथील भारतीय विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरची
पदवी घेतली आहे. काही वर्षे पुण्यामध्ये चांगल्या पगाराची नोकरी
केली मात्र गावाकडे वडिलोपार्जित शेती असल्याने शहरांमध्ये त्याचे
मन रमत नव्हते.नोकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम करून पगार घेण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत जर कष्ट केले तर आपण चांगले जीवन जगू शकतो हा निश्चय मनाशी करून ५० हजार रुपये महिन्याच्या पगाराची नोकरी सोडली.शेरी खु. ते टाकळी अमिया ,रूईनालकोल या रस्त्यावर
चार वर्षांपूर्वी २५० केशर,नीलम,हापूस,सदाबहार, दशहरी या जातीची
झाडे वडीलांनी लावलेली आहेत.ही संपूर्ण आंबा फळबाग ठिबक सिंचन पध्दतीने शेती केली जाते. पाण्याचे नियोजन, व्यवस्थापण करून संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने आंबा बाग तयार केली.दोन वर्षांपूर्वी शहरांमध्ये
इलेक्ट्रिकल इंजिनिअर असणाऱ्या सुनीलने नोकरी सोडून गावाकडे
येण्याचा निर्णय घेतला आणि याच आंबा बागेमध्ये रमू लागला.गतवर्षी पहिल्यांदाच फळे आल्याने दोन लाख ते तीन रुपये उत्पन्न झाले. मात्र
यावर्षी १० लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. अलीकडील
काळामध्ये शेतकरी तरुणांमध्ये शेती परवडत नसल्याचा फार मोठा
गैरसमज झाला आहे परंतु आधुनिक पद्धतीने शेती केली तर नक्कीच नोकरीपेक्षाही शेती परवडते हे इंजि.सुनील ढोबळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.शेतकऱ्यांना पीक घेण्याचे ज्ञान आहे मात्र विक्रीचे ज्ञान नसल्याने ही ओरड कायमस्वरूपी होत आहे.
--------------------------------------------------------------------------
आमच्याकडे आंबा बाग असून गेल्यावर्षी व्यापाऱ्यांनी अर्ध्या किमतीत
माल मागितला होता. वर्षभर आपण शेतात कष्ट करायचे आणि
आलेल्या फळाचा भाव ठरविण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना हे मात्र
मनाला न पटल्याने मी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला.जिथे पिकवतो
तिथेच विकायचे असा विचार करून करून शेतकरी ते ग्राहक असा
नवीन फंडा वापरला.आंब्याच्या बागेशेजारीच स्टॉल सुरू करून
आम्ही सध्या गवतामध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याची
विक्री करत आहोत. यावर्षी १० लाख रुपये उत्पन्न मिळण्याची
अपेक्षा आहे.
----सुनिल ढोबळे
(इंजिनीयर तथा प्रयोगशील शेतकरी )
--------------------------------------------------------------------------


0 टिप्पण्या