अहमदनगर येथील मास्टरमाईंड अकॅडमीच्या मार्गदर्शनाने पोलीस दलात निवड झालेल्या ४३ युवकांचा सत्कार करण्यात आला तसेच पृथ्वी फाउंडेशन पुरस्काराचे वितरण ही करण्यात आले.अहमदनगर येथील पृथ्वी फाउंडेशन संचलित मास्टर माईंड अकॅडमी तर्फे पोलीस भरती झालेल्या गुणवंताच्या सत्कार समारंभ व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण अहमदनगर येथे करण्यात आले या कार्यक्रमात यूपीएससी मध्ये यशस्वी झालेले महारुद्र भोर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे होते. तर, व्यासपीठावर प्राचार्य डॉ सोपानराव निंभोरे, प्रा.डॉ श्याम सांगळे, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, डॉ.प्रदिप चोभे, प्रा संतोष ठुबे, दादासाहेब घोडके, बंकट परकाळे, सिद्धनाथ मेटे महाराज, जालिंदर सायंबर आदी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महारुद्र भोर म्हणाले की ,गेल्या पाच ते सहा वर्षांपासून यूपीएससीची तयारी करीत होतो. त्यासाठी काही दिवस दिल्लीलाही राहिलो. अभ्यास करीत असताना मी ठरवून घेतले होते की ज्यावेळी अभ्यासात मन लागेल त्याच वेळी अभ्यास करायचा. मी जवळपास पाच ते सहा वेळा परीक्षा दिली. तसेच तीन वेळा मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो. साधारण तीन ते चार गुणांनी मला अपयश मिळाले. परंतु त्या अपयशाने खचून गेलो नाही किंवा हाताशही झालो नाही. मी शेवटपर्यंत धैर्य सोडले नाही आणि म्हणूनच मला यश मिळाले. अनेक वेळा अपयश मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मला अन्य क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी आहे असे सांगितले. परंतु, मी माझ्या ध्येयावर ठाम राहिलो आणि त्यामध्ये सातत्य ठेवले. अभ्यास करत असताना नेमकी कुठली पुस्तक वाचावीत आणि कोणती पुस्तके वाचू नयेत हे समजने खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.

0 टिप्पण्या