आष्टी (प्रतिनिधी)
जिद्द,चिकाटीच्या जोरावर आष्टी तालुक्यातील मातावळी येथील सुजल हरिश खंडागळे याने बीड येथील 'पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात' इयत्ता बारावी सायन्स (सीबीएसई बोर्ड) च्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्याच्या या घवघवीत यशाबद्दल मातावळी,
वनवेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला.परिसरातील ज्येष्ठ छायाचित्रकार हरिश लक्ष्मण खंडागळे यांचा सुजल हा सुपुत्र आहे.नवोदय विद्यालयासारख्या नामांकित संस्थेत विज्ञान शाखेतून शिक्षण घेत त्याने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी मानले जात आहे.

सुजलने मिळवलेल्या या उज्ज्वल यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सुजलच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी दि.१७ मे रोजी मातावळी येथे 'गुणवंत विद्यार्थी गुणगौरव' सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभाला मातावळी आणि वनवेवाडी येथील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातील अंगणवाडी सेविका, सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते सुजलचा सत्कार करून त्याला पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. एका सामान्य कुटुंबातील मुलाने घेतलेली ही उत्तुंग भरारी गावाची मान उंचावणारी आहे, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
0 टिप्पण्या