
आष्टी (प्रतिनिधी)
आई-वडील आपले संपूर्ण आयुष्य कष्टात घालवून मुलांचे संगोपन
करतात, त्यांना शिक्षण देऊन त्यांचे आयुष्य घडवतात.मात्र,तीच मुले वृद्धापकाळात
आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या आधारासाठी पुढे येत नाहीत, ही आजच्या समाजातील
अत्यंत चिंताजनक बाब बनली असल्याची खंत प्रबोधनकार गणेश शिंदे महाराज यांनी व्यक्त
केली. राज्याचे माजी कृषी आयुक्त तथा मृद व जलसंधारण विभागाचे माजी सचिव सुनीलदादा
चव्हाण आणि मुर्शदपूर कासारीचे माजी सरपंच संतोषभैय्या चव्हाण यांचे वडील,माजी
तहसीलदार कै.साहेबराव चव्हाण यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आष्टी येथे आयोजित
श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना गणेश
शिंदे महाराज म्हणाले की, सध्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा असून, 'एआय'सारख्या
प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणसाला अनेक प्रकारचा आधार आणि सुविधा मिळत
आहेत. मात्र, प्रगतीच्या या झगमगाटात माणूस आपल्या मूलभूत कर्तव्यांपासून दूर जात
आहे.ज्यांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांच्या आधारासाठी पोटची मुले पुढे
येत नाहीत,हे समाजाच्या अध:पतनाचे मोठे लक्षण आहे. आजच्या धावपळीच्या जगात धन,दौलत
आणि संपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असले तरी, माणुसकी, संस्कार आणि आपली
पारंपरिक कुटुंबव्यवस्था यांचा वेगाने ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामुळेच एक
सुसंस्कृत पिढी घडविणे हे आजच्या काळाचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. मुलांना
लहानपणापासूनच आई-वडिलांविषयी आदर, कर्तव्य भावना आणि सामाजिक मूल्ये रुजविणे
अत्यंत गरजेचे आहे. समाजातील या वाढत्या स्वार्थी प्रवृत्तीवर वेळीच अंकुश ठेवला
नाही, तर भविष्यात आपली कुटुंबव्यवस्था पूर्णपणे ढासळण्याचा धोका निर्माण होऊ
शकतो,असा परखड इशाराही गणेश शिंदे महाराज यांनी दिला. पुढे बोलताना महाराज म्हणाले
की,माणूस जन्माला येण्यापूर्वी नऊ महिने आधी त्याची चाहूल लागते,मात्र या जगाचा
निरोप घेताना ईश्वराने कोणताही पूर्वसंकेत ठेवलेला नाही. भौतिक सुखाच्या मागे
धावताना आपण हे विसरतो की,या जगात आपलं कायम स्वरूपी असं काहीच नाही. त्यामुळे हयात
असतानाच आई- वडिलांवर भरभरून प्रेम करा आणि रक्ताची,स्नेहाची नाती मनापासून
जपा.कै.साहेबराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवन म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे
मूर्तिमंत उदाहरण होते.प्रशासकीय सेवेत असतानाही त्यांनी जमिनीवरचे पाय कधी ढळू
दिले नाहीत.त्यांच्या याच सुसंस्कारांचे फलित म्हणजे त्यांचे सुपुत्र सुनीलदादा
चव्हाण आणि संतोषभैय्या चव्हाण हे होत. प्रशासकीय आणि सामाजिक अशा दोन्ही
आघाड्यांवर या दोन्ही भावांनी मिळवलेला नावलौकिक हा खऱ्या अर्थाने काकांच्या
विचारांचा विजय आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दशक्रिया विधीसारख्या
प्रसंगामधून केवळ पारंपरिक कर्मकांड न होता समाजाला 'नाती जपण्याचा' वैचारिक संदेश
मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी राजकीय,सामाजिक,साहित्यिक
आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या शोकभावना व्यक्त
केल्या.या शोकसभेत श्रीहरी पुरी महाराज,ह.भ.प.सविता शास्त्री खेडकर महाराज, ज्येष्ठ
पत्रकार उत्तम बोडखे,चेअरमन संजय गाढवे, अमोलराजे तरटे, अमरराजे निंबाळकर, संजयशेठ
मेहेर, काकासाहेब शिंदे, नामदेव राऊत, शरद पवार चिंचोडी, माजी सभापती बाबासाहेब
गुंजाळ, सतिशआबा शिंदे, कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन, आण्णासाहेब चौधरी, महेश
कारखान्याचे चेअरमन राजेंद्र धोंडे,किशोर lनाना हंबर्डे,माजी आ. साहेबराव दरेकर
यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत साहेबराव चव्हाण यांच्या
प्रशासकीय व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी
क्रीडा आयुक्त शितल उगले,अप्पर पोलीस आयुक्त बस्वराज तेली (पिंपरी
चिंचवड),प्राचार्य एम.डी पाटील (उद्यान विद्या),कृषी अधिकारी चंद्रशेखर
नखाते,फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विद्यार्थी
कल्याण पुरुषोत्तम झंवर,मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कामाजी पवार,अव्वर
सचिव व ग्रंथपाल रमेश साळवे मुंबई, उपनिबंधक सहकारी संस्था बिबीषन लावंड, कृषी
अधिकारी राचेवाड,निर्मल कुमार देशमुख (IAS),विजय घोगरे,मुख्य अभियंता जलसंपदा,कैलास
जाधव (IAS), संतोषशेठ मेहेर, संजयशेठ मेहेर,डॉ. रामदास मोराळे, अमरराजे निंबाळकर,
संपतराव धोंडे,पी. वाय.काळे,गणेश दळवी,शशिकांत डोमकावळे आदि मान्यवर उपस्थित
होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पोकळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार
संतोषभैय्या चव्हाण यांनी मानले. ----------------
0 टिप्पण्या