

मराठवाडा भूषण,लोकनेते तथा आ.सुरेश धस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली कऱ्हेवडगावचे विद्यमान सरपंच तथा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक परिवंत उत्तम गायकवाड यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.त्यांचे कार्य केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही,तर ते थेट जनसामान्यांच्या नाडीशी जोडलेले आहे.दिन-दलित, गोरगरीब, ऊसतोडणी कामगार आणि बळीराजा यांच्याशी अत्यंत आपुलकीचे नाते जपणारा हा एक 'ग्राउंड लेव्हल'चा कार्यकर्ता आहे.समाजातील कोणतीही समस्या असो,परिवंतराव ती केवळ वरवर पाहत नाहीत,तर तिच्या मुळाशी जाऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर त्यांचा भर असतो. शेतकरी अडचणीत असो, नैसर्गिक संकटात सापडला असो किंवा एखादे गरीब कुटुंब आर्थिक विवंचनेत असो,अशा वेळी ते स्वतः पुढे येऊन मदतीचा हात देतात.संकटकाळात त्यांच्या तोंडून येणारे,“काळजी करू नका,मी आहे!” हे शब्दच जनतेसाठी मोठा आधार ठरतात.
वादविवाद मिटवणारा संवादाचा सेतू
--------------
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि समाजाला दिशादर्शक ठरणारा पैलू म्हणजे गावातील तंटे आणि वादविवाद सोडवण्यात त्यांची असलेली हातोटी. कऱ्हेवडगाव किंवा पंचक्रोशीत कोणताही वाद निर्माण झाला, तर तो वाढू न देता तात्काळ मध्यस्थी करून शांततेत तोडगा काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या संवेदनशील मध्यस्थीमुळे अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र आली आहेत, तुटलेली नाती जुळली आहेत आणि गावाचा एकोपा टिकून राहिला आहे. ते केवळ एक नेते नाहीत, तर समाजघटकांना जोडणारे एक विश्वासार्ह दुवा आहेत.
संकटकाळातील देवदूत
------------
संकटकाळात त्यांच्या कार्याची खरी ओळख अधिक ठळकपणे समोर येते. कोरोनाच्या महाभयंकर महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी अनेक गरजूंना मदत केली. अन्नधान्य,औषधे आणि आरोग्य साहित्य पुरवून अनेक कुटुंबांना आधार दिला. अतिवृष्टी,पूरस्थिती किंवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांनी तातडीने मदतकार्य राबवले. 'राजदीप कन्स्ट्रक्शन'च्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली आहे. संकटातही लोकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिलासा हाच त्यांच्या कार्याचा खरा पुरस्कार आहे.
युवकांसाठी प्रेरणास्थान
----------------
त्यांच्या कार्यामुळे कऱ्हेवडगावच्या विकासाची गती वाढली असून, जनतेच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत. युवकांसाठी ते एक मोठे प्रेरणास्थान आहेत.तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करतात.नेहमी लोकांमध्ये मिसळून राहणे,त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि प्रत्येकाला आपलेसे करणे, या स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके बनले आहेत.आ.सुरेश धस यांच्या मुशीत तयार झालेला हा निष्ठावान कार्यकर्ता सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. भविष्यात आमदार सुरेश धस हे त्यांना निश्चितच चांगले पद देऊन परिसराच्या विकासाची मोठी संधी देतील, असा विश्वास जनतेमध्ये व्यक्त होत आहे.
परिवंत गायकवाड हे केवळ एक नाव नसून,दातृत्व, कर्तृत्व, संवेदनशीलता आणि निस्वार्थ जनसेवेचा तो एक विचार आहे. गावाचे गावपण आणि माणसांतील माणुसकी टिकवण्यासाठी झटणाऱ्या या आदर्श सरपंचाला उदंड आणि निरामय आयुष्य लाभावे.त्यांच्या हातून असेच समाजहिताचे कार्य अखंड घडत राहो, याच 'दैनिक झुंजार नेता' परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
लेखक - उत्तम बोडखे
(वरिष्ठ पत्रकार,आष्टी)
----------------
0 टिप्पण्या