Ticker

6/recent/ticker-posts

मातोरीची तेव्हाची दिवाळी

,
माझ्या बालपणीचे गाव,बीड जिल्ह्यातील मातोरी, हे एक जीवंत आणि प्रेमळ स्वप्न सदृश गावं आहे. पूर्वीचा गेवराई तालुका आणि आताचा शिरूर का. तालुका यातील हे गाव केवळ एक भौगोलिक ठिकाण नव्हते तर एक संस्कृती होती. त्या काळात, माझे वडील तेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि म्हणूनच आमचे कुटुंब तिथे वास्तव्यास होते. इयत्ता पाचवीत शिकणारा मी, मातोरी च्या प्रत्येक रंगाने रंगून गेलो होतो. मातोरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील धार्मिक सौहार्द. प्राथमिक शाळे जवळच्या विठ्ठल मंदिरात दररोज सायंकाळी 'हरिपाठ' चालायचा. त्याच वेळी,सालसीत बाबाच्या दर्ग्यातून नगाऱ्याचा आवाज येई. हनुमान मंदिर आणि त्याच्या अगदी शेजारीच मशिद ही तिघे जण शेजारी-शेजारी राहायची.या सर्वांच्या जवळ असण्याने कधीच तणाव निर्माण झाला नाही,उलट सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. 'पोताडे महाराज' म्हणून ओळखले जाणारे संत-तपस्वी गावात येत आणि भजन - कीर्तनांचा अखंड सुरू असलेला ओलावा गावाला एक आध्यात्मिक ऊर्जा देत असे. शिक्षणाची ज्योत मातोरीतही तेवत होती,जरी सोयी सुविधां मर्यादित होत्या. तरी 'भीमसिंह विद्यालय' नावाचे माध्यमिक विद्यालय सालशीद बाबा मंदिराच्या खोल्यांतून चालायचे.काही वर्ग मारुती मंदिरातही भरत असत. मंदिराच्या मागे असलेल्या 'बारव' मध्ये नेहमी स्वच्छ पाणी असे.मराठी शाळे जवळच्या हात पंपाला खूप पाणी होते. शेतात जनावरे घेऊन जाणारे लोक तिथेच त्यांना पाणी पाजत असत.हा निसर्ग आणि जीवन यांचा साधा, पण गोड संबंध होता. गावाच्या पूर्वेकडील टेकडीवर असलेले महादेव मंदिर संध्याकाळच्या वेळी अत्यंत सुंदर दिसत असे. धारवाडीकडे जाणारा रस्ता चढ-उताराचा होता. तेथील ओढ्यात गावातील महिला कपडे धुत असत. हा सगळा निसर्गरम्य परिसर मन मोहून टाकणारा होता. शाळेच्या प्रांगणात खेळताना सायंकाळच्या हरिपाठाचे शब्द कानावर पडत आणि आपोआपच तो हरीपाठ पाठ होई. मनात बसून जाई.या मातोरी मध्ये माझे अनेक वर्ष गेले आणि तिथे मला अनेक मित्रांची सोबत मिळाली.राम आणि मोहन जरांगे, नामदेव आणि तुकाराम येवले हे आमचे जीवलग मित्र होते.संतोष कवाड,सुभाष गर्जे, अशोक येवले, राजेंद्र जरांगे,प्रकाश, खाजा शेख, गायकवाड टेलरचा बंधू, सोनाराचा सुभाष, धारवाडी चा रावसाहेब शिंदे हे आमचे वर्गमित्र होते. ही मैत्री धर्म, जात या सर्व मर्यादांपलीकडे जाऊन खऱ्याअर्थाने 'सर्वधर्म समभाव' चे प्रत्यक्ष उदाहरण होती.गावकऱ्यांची एकोप्याची भावना संकटाच्या वेळी उजळून दिसायची. एकदा पानदितील शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग लागली, पाच- पंचवीस गोठे पेटून खाक झाले. त्या वेळी शाळेतील मुले, मोठी माणसे, प्रत्येकजण हातात येईल त्या साहित्यासह आग विझवण्यासाठी धावत सुटले. सर्वांच्या सहकार्याने आग लवकर नियंत्रित झाली, पण अनेकांचा जनावरांचा चारा नष्ट झाला होता. ही समान दुःखे आणि समान प्रयत्न गावाला एकत्र बांधून टाकायचे.दिवाळीचा सण मातोरी त विशेष असे.जवळ च्या तिंतरवणी बाजारातून सर्वजण फटाके,भाजी पाला आणि इतर जिन्नस आणायचे. गावात असणाऱ्या एक दोन कापड दुकानातून कापड घेऊन टेलर कडे कपडे शिवायला अगोदरच दिली जायची.घरातील सगळे स्त्री-पुरुष, लहान मुलेही फराळ तयार करण्यात गुंतून जात. महिला एकमेकींच्या घरी जाऊन मदत करायच्या.लहान मुलं आपल्या मित्रांना घरच्या फराळाचा आस्वाद देण्यासाठी हाफपॅंटीच्या खिशात घालून फराळातील काही पदार्थ आणत. त्यावेळी फोडले जाणारे फटाके कमी धुराचे असायचे, पण आनंदाचे प्रमाण अफाट असायचे. गरीब-श्रीमंताचा भेद न करता, सर्वांना सहभागी करून घेण्याची वृत्ती ही खरी दिवाळी होती. परदेशात काम करून येणारी 'वखरे कंपनी' दिवाळीत गावी येताना परदेशी मिठाई आणायची आणि शेजाऱ्यांना ही द्यायची. भरपूर हिरवळ, शांत नितळ वाहणारे ओढे, भक्तीगीतांचे स्वर, मैत्रीचे आणि सहकार्याचे बंध, सर्वधर्मातील एकता यांनी विणलेले मातोरी हे गाव आजही माझ्या डोळ्यांसमोर चित्रपटासारखे उभे राहते. त्या काळची दिवाळी खासच होती. केवळ उल्हासाची नव्हे, तर माणुसकी आणि एकात्मतेची प्रतीक. मातोरी हे केवळ एक गाव नव्हते, तर जगण्याच्या एका सुंदर पद्धतीचे दर्शन घडवणारे, मनाला मोहून टाकणारे एक पुस्तकच होते, ज्याचे प्रत्येक पान आजही माझ्या स्मृतीत जिवंत आहे. --- सुनील गोसावी. संस्थापक सचिव, (शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या