
आष्टी ( प्रतिनिधी)
सध्याच्या भयाण वास्तवावर आधारीत कविता कवी हारिष हातवटे यांनी " सतरा साते किती ? " ही कविता सादर केली.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय सगळं छान
पण सुकून चाललेत फुलं अन् वाळून चाललंय पान
फाटत चाललंय कापड
त्याला शिवू तरी किती?
कसं सांगू गुरुजी
सतरा सात किती?
श्रावणातच पानझडीची लागते इथे चाहूल
चोहीकडे काटेच गुरुजी ठेवू कुठे पाऊल?
तोंड असून गप्प राहायचं अशी परिस्थिती
कसं सांगू गुरुजी सतरा साते किती?
या कवितेला भरभरुन प्रतिसाद दिला.आष्टीचे कवी प्रा.सय्यद आल्लाउद्दीन यांनी " एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले "ही गेयकविता सादर केली.
" कुणी घेतला हंडा
कुणी घेतला गिलास
सा-यांनीच चंद्रावरचे
पाणी केले खल्लास..."
ही कविता सदरीकरण होताना रसीकांनी चक्क टाळ्यांचा ठेका धरला.
सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा असलेला मुद्दा नागपूर अधिवेशनात गाजलेले मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्यावर कवी संजय शेळके यांनी
" हत्या " कविता सादर केली.
बीड की बिहार
हे शब्द गाजले
गुन्हेगार सारे
इथे माजले...
संतोष देशमुखची
झाली निघृन हत्या...
लेकरं बाळं त्यांची
उघड्यावर पडली..
हृदय पिळवणारी
घटना घाडली....
या कवितेने रसिक अक्षरशः गहिवरले...
शारीरिक परिश्रम असो की खूप अभ्यास करून यशस्वी व्हायचे असो, त्याला पर्याय नसतो.हे स्पर्धेचे युग आहे इथे पुस्तकाशिवाय पुस्तकाबाहेरचे शिक्षण आवश्यक आहे.आज मानवाची जागा यंत्र मानव घेऊ लागलेला आहे. आर्टिफिशियलच्या नावाखाली माणसाच्या हातचे काम सुटू लागले आहे.एकीकडे जनसंख्या वाढते आहे. दुसरीकडे कमीत कमी मनुष्य बळावर काम करून घेणारी यंत्र मानवाची सरशी झाली आहे.ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.भविष्यासाठी भयावहसुद्धा.आज विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे अनेक भाषेमधून ज्ञान संपादन करण्याची विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे.कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या झिंदाबाद... मुर्दाबाद संग्रहातील २५ निवडक कविता प्रा.डॉ.अभय शिंदे यांनी इंग्रजी भाषेत अनुवादित केल्या आहेत.ही महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या मराठी कविता महाराष्ट्राला परिचित होत्या.आता त्या इंग्रजीमुळे जगात प्रसिद्धी पावतील,ही गौरवास्पद बाब आहे असे संस्थाध्यक्ष किशोर हंबर्डे म्हणाले.
आष्टी येथील बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.अभय शिंदे यांनी कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद केलेले " फेसेस बिहाइंड मास्कस् " आणि " इंडियन बुकर प्राईज विनर " या दोन पुस्तकांचे संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांच्या हस्ते नववर्षारंभी काव्य मैफिलीत प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांनी केले.शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्राप्त झाल्याबद्दल आणि पीएच.डी.पदवी प्राप्त झाल्याबद्दल कवी डॉ.हरीश हातवटे यांचा संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यिवेळी काव्य मैफिलीत कवी सय्यद अल्लाउद्दीन,कवी डॉ. हरीश हातवटे,संजय शेळके यांनी बहारदार कविता सादर केल्या.
कवी संजय शेळके यांनी संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील,कै.संतोष देशमुख यांचा कवितेतून खास शैलीत गुणगौरव केला.जामखेड येथील प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक कवी प्राचार्य आ.य.पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. जेष्ठ पत्रकारा उत्तम बोडखे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अभय शिंदे यांनी तर प्रा.डॉ.सखाराम वांढरे यांनी आभार मानले.

----------------------------
0 टिप्पण्या