विशेष लेख
--------
प्रा.महेश चवरे,आष्टी.
एखाद्या व्यक्तीचे सार्वजनिक जीवनातील
नेतृत्व त्याच्याकडे असलेल्या सत्ता,संपत्ती,पद,उद्योग धंदा,संस्था,पैसा,प्रसिद्धी
यावरच फक्त अवलंबून नसते तर त्याचा सर्वसामान्य लोकांशी लोकसंपर्क किती आहे
किंबहुना त्यांच्याशी त्याच वागणं व संभाषण कसं आहे यावर ते ठरत.कुठलीही संस्था
किंवा उद्योग समूह यशस्वी होण्यासाठी टीम वर्क खूप महत्वाचे असते आणि त्यासाठी
त्याचा एक नेताही असावा लागतो.त्या नेत्याचे कुशल नेतृत्वचं त्या संस्थेच्या व
उद्योगाच्या प्रगती किंवा अधोगतीला कारणीभूत ठरते.असंच आष्टी तालुक्यातील गतिशील
कृती करणारं यशस्वी कुशल नेतृत्व म्हणजे जय भोले उद्योग समूह आणि आष्टी तालुका
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे हे आहेत.ज्यांना सर्वत्र " नाना "
या टोपन नावाने ओळखले जाते.नानांनी मिळवलेले यश हे त्यांच्यात असलेली आपलं ध्येय
गाठण्यासाठीची जिद्द व त्यासाठी दीर्घ काळ मेहनत करायची त्यांची तयारी,त्याचबरोबर
नीतिमत्ता व पारदर्शक व्यवहार या गुणांच्या जोरावरच प्राप्त केले.नाना
संस्थेत,उद्योगात किंवा सार्वजनिक जीवनात कुठलाही निर्णय खूप दूरगामी विचार करून
घेतात.


आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही याची शहनीशाही करतात त्यासाठी जवळच्या
लोकांशी चर्चा करतात.आवश्यक वाटेल तिथे सुधारणा करून घेतलेल्या निर्णयाला योग्य
गती देऊन त्याची प्रत्यक्ष कृती करून त्यात यशही मिळवतात.नानांनी संस्था,शेती व
उद्योग यात घेतलेल्या कुठल्याही भूमिकेसाठी किंवा प्रकल्पासाठी काम करणाऱ्या योग्य
व्यक्तींची निवड कशी असावी याचे वास्तविक ज्ञान त्यांच्याकडे आहे म्हूणनच प्रत्येक
ठिकाणी योग्य ते कौशल्य असणारी माणसंच त्यांनी बसवले आहेत.माणूस आपल्या क्षेत्रात
स्वतः किती मोठा आहे किंवा त्याने किती पैसे कमावले याला फार महत्व नाही पण तो
स्वतःबरोबर समाजातील इतर गरजवंताची किती कुटुंब जगवतो याला खूप महत्व आहे.आज
किशोरनाना यांंच्यामुळे किमान ३०० कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे विविध मार्गाने साधनं
निर्माण झाली आहेत.नाना त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक
चांगला सुसंवाद ठेवतात,त्यांच्या असलेल्या समस्या जाणून घेतात.त्यावर योग्य तोडगा
काढण्यासाठी कोणत्याही पातळीवर त्यांची मदत करतात.जगाच्या प्रवाहा बरोबर राहून
स्वकर्तुत्वाला गती देण्याचे काम नानांनी कायमच केले,अखंड क्रियाशील राहून कामात
स्वतःला वाहून घेणे त्यांना आवडतं,थांबणे हे त्यांच्या मूळ स्वभावातच नाही त्याचे
कारण आपली नैसर्गिक रचना ही आपल्याला कायम गतिमान राहण्याचेच शिकवते.या पृथ्वीतलावर
असा एक ही मनुष्य नाही की ज्याला काहीच समस्या नाहीत नानांना ही वैयक्तीक व सामाजिक
जीवनात खूप अडचणी व समस्या आल्या,आजही येतात परंतु या संकटाला न घाबरता न डगमगता ते
त्याला सामोरे जातात,समस्येचा अभ्यास करतात त्याचे मूळ कारण शोधून काढतात त्याच्या
होणाऱ्या साधक बाधक परिणामांचा विचार करून त्यावर मार्ग काढतात.प्रत्येक प्रतिकूल
प्रसंगात खंबीरपणे उभे राहून आपल्या दैनंदिन जीवन शैलीवर त्याचा कसलाही परिणाम ते
होऊ देत नाहीत ते नेहमी भावनेपेक्षा बुद्धीच्या कसोटीवर काम करण्याचा प्रयत्न करतात
त्यांच्या वागण्या बोलण्यातून कधीच निराशा,संकट,दुःख,पश्चाताप,चिंता,भीती व्यक्त
होत नाही.नाना भूतकाळात फारसे कधी रमत नाहीत.उज्वल भविष्काळासाठी उड्डाण घेण्याचा
प्रयत्न मात्र त्यांचा कायम असतो त्यासाठी त्यांचे पाय मात्र वर्तमानकाळात नेहमीच
जमीनीवर असलेले पाहायला मिळतात.साहित्य,कला,शिक्षण, संस्कृती,विज्ञान
तंत्रज्ञान,शेती,खेळ,उद्योग,राजकारण अशा विविध क्षेत्राची त्यांना आवड आहे
किंबहुना बऱ्यापैकी त्याचे ज्ञान त्यांना अवगत असल्यामुळे त्याचा वापर ते कौशल्याने
करतात.ते अध्यक्ष असलेली आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था या
वर्षी ५० वे.सुवर्ण मोहत्सवी वर्ष साजरे करत आहे.१९७२ साली दुष्काळी ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांंना शिक्षण घेण्याची सोय व्हावी म्हणून हे शिक्षण संस्थेचे
रोपटे लावले गेले.कालांतराने त्याचा पसारा वाढून वृक्ष तयार झाला परंतु या संस्था
रुपी वृक्षाला खरी बहार आली ती किशोरनाना हंबर्डे यांनी संस्थेचा कारभार हाती
घेतल्यानंतरच असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही आज संस्थेचे कला,वाणिज्य, विज्ञान
पदवी ते पदव्युत्तर महाविद्यालय,विविध व्यावसायिक कोर्सेस,पिंपळेश्वर इंग्रजी
माध्यमाची शाळा आज दिमाखात सुरु आहे.किशोरनानांनी यावर्षी विशेष प्रयत्न करून
ॲड.बी.डी.हंबर्डे विधी महाविद्यालयाची स्थापना केली.त्याद्वारे आता ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कुठेही बाहेर जिल्ह्यात
जाण्याची गरज नाही.सर्व विभागाच्या विद्यार्त्याना ज्ञान मिळवताना दर्जेदार पुस्तके
वाचण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असे आधुनिक मध्यवर्ती ग्रंथालय महाविद्यालय परिसरात
सुरू केले आहे.विद्यार्थ्यांना व्यायामासाठी जीम व दोन मोठे क्रीडांगण
महाविद्यालयात तयार केले आहेत. महाविद्यालय परिसरात रोज वापरासाठी लागणाऱ्या
पाण्याची कायमची अडचण सोडवण्यासाठी महाविद्यालयात शेततळे बांधण्याचा अभिनव प्रयोग
नानांनी केला आहे.महाराष्ट्रातील एखाद्या शिक्षण संस्थेने शेततळे बांधण्याचा प्रयोग
हा कदाचित एकमेवाद्वितीय असावा.नानांनी वैयक्तिक लक्ष देऊन वेळ दिल्यामुळेच
महाविद्यालयाला नॅकचा " अ " दर्जा मिळाला आहे.पुढच्यावर्षी गुरकुल सेमी इंग्रजी
माध्यमाची शाळा सुरु करणे व भव्य दिव्य प्रशासकीय बिल्डिंग,संस्था कार्यालय उभा
करण्याचा नानांचा मानस आहे.किशोरनाना स्वतः सिव्हील इंजिनिअर आहेत.एकेकाळचे बीड
जिल्ह्यातील नावाजलेले ते शासकीय गुत्तेदार होते.माजी आ.साहेबराव दरेकर (नाना),आ.
सुरेश धस आणि आ.बाळासाहेब आजबे यांच्याबरोबर त्यांनी काम केलेले
आहे.आज त्यांचे आष्टी येथे विविध व्यवसाय सुरू आहेत,आधुनिक तंत्रज्ञान वापरून ते
शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. किशोरनानांनी बांधलेल्या नवीन घराच्या गृहप्रवेश
प्रसंगी तर देशाचे नेते शरद पवारसाहेब यांची उपस्थिती लाभली हा क्षण " नानांना
"आयुष्यात सर्वात मोठा आनंद देणारा होता.राजकारणात,समाजकारणात नेहमीच सक्रिय राहून
प्रत्येकाच्या वैयक्तिक सुख दुःखात ते हजर असतात,संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाच्या
अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना चांगले मार्गदर्शन करतात. कोणत्याही
वयोगटात कोणत्याही जाती धर्मात किंवा कुठल्याही गावात त्यांनी माणसं जोडली त्यांनी
माणसांवर माणुसकीवर प्रेम केले म्हणूनच कुठंही त्यांच्या बरोबर माणसं
दिसतात,त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात.म्हणूनच एखाद्या ठिकाणच्या सामाजिक
कार्यक्रमातील त्यांच्या अनुपस्थितीची दखल समाजाकडून घेतली जाते कोणी कुठे चुकले तर
त्याला हक्काने रागावतात व त्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही तेवढयाच मोठ्या
मनाने चारचौघांत करतात ही त्यांची जमेची बाजू आम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे.हाती
घेतलेल्या प्रत्येक कामावर बारीक लक्ष ठेवून चिकाटीने त्या कामासाठी कितीही कष्ट
झाले तरी ते पूर्णत्वास नेणं हे त्यांचे आजपर्यंतचे खास वैशिष्ठ म्हणता येईल.११
नोव्हेंबर रोजी किशोरनानांचा जन्मदिवस असतो..तो दरवर्षी महाविद्यालयात रक्तदान
शिबिर,आरोग्य तपासणी,वृक्षारोपण,रुग्णांना फळ वाटप आदी सामाजिक उपक्रमांनी साजरा
केला जातो नानांचे विविध गुणसंपन्न असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्वच त्यांच्या
सामाजिक प्रभावाचे एक प्रमुख कारण ठरले आहे माझ्या वैयक्तिक जीवनातील मार्गदर्शक व
कुटुंबासाठी आधारवड असणाऱ्या किशोरनाना हंबर्डे यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..
लेखक- प्रा.महेश चवरे,आष्टी.
***********************
0 टिप्पण्या