








--उत्तम बोडखे,आष्टी.
.................
विद्यार्थ्यांनी
अभ्यासाबरोबरच चार गोष्टी लक्षात ठेवाव्यात दुसऱ्यापेक्षा वेगळे करणे,कल्पनाशक्तीचा
वापर करणे,नाविन्याची आवड ठेवणे आणि चांगला पाठिंबा मिळवणे हे करत असतानाच मोठी
मोठी स्वप्ने उराशी बाळगून त्यासाठी उत्तुंग झेप घेऊन आकाशाला गवसणी घाला.मोठे
स्वप्न उराशी बाळगून उत्तुंग झेप घ्या.यश तुमचेच आहे असे आवाहन राज्याचे कृषी
आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले. स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने
सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते प्रमुख मार्गदर्शन करताना
बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे ,जेष्ठ
पत्रकार उत्तम बोडखे ,प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर,आष्टी तालुका कृषी अधिकारी
गोरक्षनाथ तरटे,आष्टीचे गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,वसुंधरा विद्यालयाचे
सर्वेसर्वा शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस,संस्थेचे माजी चेअरमन सुरेश
पवार,पत्रकार प्रवीण पोकळे,अंबाजोगाई येथील डायट संस्थेचे अधिव्याख्याता पांडुरंग
चव्हाण,वैद्यकीय अधिकारी डॉ.बांगर हे उपस्थित होते. कृषी आयुक्त सुनील चव्हाण पुढे
बोलताना म्हणाले की,विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सध्याच्या माहिती आणि
तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा आपण काहीतरी वेगळे करून
आपला वेगळेपणा सिद्ध करावा.प्रत्येकाचा बुद्ध्यांक कमी जास्त असल्यामुळे बुद्धी कमी
असली तरी चालेल परंतु तुम्ही कल्पना करत रहा.या कल्पनेच्या आविष्कारातूनच तुम्हाला
सुंदर असे काही सुचेल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी नाविन्याची आवड ठेवली पाहिजे
नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन आव्हाने नवनवीन शोध याबाबतचा अत्यंत बारकाईने शोध
घेण्याची आवड प्रत्येकाने ठेवावी.त्याच बरोबर महत्त्वाची बाब अशी की, प्रत्येक
विद्यार्थी,विद्यार्थीनी यांनी शिक्षक,आई-वडील आणि मित्र यांचा भक्कम पाठिंबा
मिळवावा. कारण चांगला पाठिंबा असेल तरच तुम्ही चांगलं करू शकता त्यामुळे
आई-वडिलांचा मान ठेवून. शिक्षकांचा आदर करून आणि मित्राच्या सल्ल्याचा वापर आपल्या
भावी जीवनात करावा मोठी मोठी स्वप्ने पाहून त्या दिशेने वाटचाल करावी चांगले ध्येय
ठेवा चांगला अभ्यास करा चांगले प्रयत्न करा. यश अपयशाचा विचार करू नका. भारताचे
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, अब्दुल कलाम यांना
वैमानिक, पायलट व्हायचे होते त्यासाठी त्यांनी परीक्षा दिली परंतु त्या
परीक्षेमध्ये ते अयशस्वी झाले तरी ते खचले नाहीत त्यांनी संशोधन करून " मिसाईल मॅन
" ही पदवी मिळवली. आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले असून सध्या जिल्हा
परिषदेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असून केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या नवोदय
विद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्यास व नाकारू नका आपल्याकडे मुलगा बाहेर कुठे जाऊ नये
म्हणून नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला असून देखील काही विद्यार्थी गेले
नाहीत हे दुर्दैवी असून अशा पालकांची मुले काहीही प्रगती करणार नाहीत कारण
बाहेरच्या जगाशी संबंध आल्याशिवाय मुलांमध्ये आत्मविश्वास येत नसतो. माझ्या
मायभूमीत असलेल्या शाळेतून इतके बुध्दिवंत आणि गुणवंत विद्यार्थी तयार होत आहेत हे
पाहून मी भारावून गेलो असून विवेकानंद शिक्षक पतसंस्थेने एकाच कुटुंबात अनेक गुणवंत
असलेल्या कुटुंबांना एकत्रित करून त्यांच्याकडून त्यांच्या यशस्वीतेचा मंत्र
समजावून घ्यावा त्यातून इतरांनी आदर्श घ्यावा अशा कुटुंबांची राज्यभरात प्रसिद्धी
करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली.माझ्या हातून या माझ्या मायभूमीतील
विद्यार्थ्यांचा सत्कार होत असल्यामुळे आनंद होत असल्याचे सांगून ते म्हणाले की,या
शिक्षक पतसंस्थेकडे धनशक्ती बरोबरच बुद्धीचा देखील संचय असल्याचे दिसून आले आहे.
स्वामी विवेकानंद हे या पतसंस्थेचे नाव असून या सभासदांच्या पाल्यांनी स्वामी
विवेकानंदांसारखे. विलक्षण स्मरणशक्ती,अतिवेगाने वाचन, उत्कृष्ट वक्तृत्व,या
गुणांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण म्हणजे क्षमतांचा विकास असून फक्त
परीक्षेतील गुण मिळवणे म्हणजे यश नसून विद्यार्थी सर्वांगीण विकसित होणे म्हणजे
शिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.बीड जिल्ह्यात पाऊस कमी असला तरी गुणवत्तेचा
मात्र भरपूर मोठा पाऊस पडल्याचे या विद्यार्थ्यांच्या गुणप्राप्तीवरून दिसून येत
आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी सर्वांगीण अभ्यास करताना अनन्यसाधारण ठसा उमटवून
आपले अस्तित्व निर्माण करावे. शिक्षक आणि पालकांनी देखील आपला विद्यार्थी कोणत्या
क्षेत्रामध्ये प्रवीण होतोय याकडे लक्ष देण्याची गरज असून त्याच्या आवडी आणि कल
लक्षात घेऊन त्याचेवर संस्कार करण्याची गरज आहे. म्हणजे त्या क्षेत्रात तो चांगली
कामगिरी करेल असे सांगून शेवटी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चांगले ध्येय.
चांगली दिशा आणि चांगली गती अभ्यासात ठेवावी असे सांगताना.. " मंजीलोकी असली उढाण
अभी बाकी है ! इरादोके इम्तेहान अभी बाकी है! अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन आगे
सारा आसमान बाकी है! " अशा शायरीने त्यांनी आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला. या
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले कवी प्रभाकर साळेगावकर
यांनी आपल्या काव्यातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी यांच्या व्यथा आपल्या
कवितेतून अत्यंत परिणामकारक रीतीने मांडणी केली आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना
अनमोल मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये... स्वामी विवेकानंद शिक्षक
सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मारुती पठाडे यांनी संस्थेद्वारा शिक्षकांना सभासदांना
चेक लेस बँकिंग, त्वरित आणि सुलभ कर्ज योजना, मोबाईल ॲप्लिकेशन सुविधा आणि एसएमएस
सुविधा निर्माण केल्या असून संस्थेचे.. भाग भांडवल २४ कोटी ४० लाख ५१ हजार रुपये
असून संस्था दि. ३१ मार्च २०२३ अखेर १ कोटी ९३ लाख १९ हजार ३०४ रु.आणि ३१ जुलै २०२३
अखेर. ८८ लाख ९० हजार ७९९ रु.इतका संस्थेला नफा झाल्याचे त्यांनी सांगितले संस्था
ही शिक्षक सभासदांच्या सुविधेसाठी, कल्याणासाठी वचनबद्ध असून सभासद कल्याण निधीतून
मयत सभासदांच्या वारसा २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते असे त्यांनी
सांगितले.. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संस्थेचे संचालक महादेव
आमले आणि अशोक उढाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भादवे
यांनी केले यास गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये शिक्षक सभासदांच्या
४० गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी
पदाधिकारी संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या