आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन युवकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेमध्ये यश मिळवत आपले फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आष्टी तालुक्यातील केरूळ लगतच्या शेलारवाडी येथील अशोक रामदास शेलार याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.अशोक याचे आई-वडील शेतकरी असून तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने २०१८ - २०१९ मध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली होती.कोरोनामुळे लांबलेल्या २०२० च्या पीएसआय परीक्षेत त्याने हे यश मिळवले आहे. यापुढे आणखी उच्च पदावर जाण्याचे त्याचे स्वप्न आहे.
त्याचप्रमाणे फत्तेवडगाव येथील आबा ज्ञानदेव काळे यांने देखील आपले पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.त्याचीही पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. तोही शेतकरी कुटुंबातील असून त्याचे आई वडील शेती करतात.कडा येथील गांधी महाविद्यालयातून त्याने बी.एस्सी ही पदवी मिळवल्यानंतर पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.तब्बल चार वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली.यशाने हुलकावणी दिली तरीही आपली जिद्द न सोडता प्रयत्न सुरूच ठेवले आणि या परीक्षेत यश मिळवले.यापुढे अजून प्रयत्न करून पोलीस उपाधीक्षक ( DYSP) होण्याचे त्याचे स्वप्न आहे.
0 टिप्पण्या