उत्तम बोडखे,आष्टी
--------------

संतश्रेष्ठ जगद्गुरू ह.भ.प. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अल्पायुष्यामध्ये अध्यात्म क्षेत्रातून आपल्या शब्दांच्या मोत्यातून अंधश्रद्धेत रुतलेल्या,फसलेल्या आणि गाडल्या गेलेल्या मानवी समाजाला परिवर्तनाचा..आधुनिकतेचा नवा मंत्र आणि दिशा दिली.आपल्या असंख्य शेकडो कीर्तन आणि अभंग रचनेच्या माध्यमातून सूर्यचंद्र असेपर्यंत मानवी जीवनाला ज्ञानाचा सूर्य अखंड तेवत ठेवण्याचे अमोघ,अमूल्य कार्य केले.अशा या ज्ञानसागरातील मानव धर्म परंपरेला जागवून खरी,मुर्त सेवा करणाऱ्या या महामानव संत रुपी सूर्याच्या विचारधारेला स्मरून आपल्या अध्यात्मक सेवेला वाहून घेतलेले मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील समाज प्रबोधनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापूंचा उल्लेख करणे, तितकेच अपरिहार्य आहे. साधारणपणे आजकाल कीर्तनकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक व्यावसायिक स्वरूपाचा झाल्याचे दिसून येते परंतु तरीही काही कीर्तनकार अंधश्रद्धा रूढी-परंपरांना तिलांजली देत मानवधर्म जागृत ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करतात.यामध्ये समाज प्रबोधनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापूंचाचा उल्लेख अभिमानास्पद आहे.आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत ३७ वर्षांच्या कीर्तनसेवेच्या परंपरेत त्यांनी तब्बल महाराष्ट्र आणि भारतामध्ये २० हजार कीर्तन सेवा.एक रुपयाही मोबदला न घेता,स्वतःच्या खर्चातून करून विश्वविक्रम नोंदवला आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरालगत आपल्या शेतीमध्ये मळा फुलवत म.फुलेयासारख्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेत आणि संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम,संत भगवानबाबा,संत वामनभाऊ यांच्या आधुनिक विचारधारेला स्मरून निस्वार्थ, प्रमाणिकपणे सेवा करण्याचा धर्म ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापू चालवत आहेत.महाराष्ट्रभर आणि इतर राज्यांमध्ये स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये स्वतः डिझेल टाकून आपल्या शेती आणि दुकान व्यवसायातील पैसा धार्मिक कार्यासाठी खर्च करत आहेत.या अलौकिक कार्याची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.अशा या वैराग्यमूर्ती आणि खऱ्या अर्थाने संत जीवनास पात्र असलेल्या गुनी कीर्तनकाराची मराठी वाहिनीवर हरिकीर्तन सेवा झालेली आहे.मानवी समाज व्यवस्थेमध्ये प्राचीन,मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंड अशी रचना केल्यानंतर प्राचीन काळात मानवी जीवन अत्यंत खडतर अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्यात अडकून पडलेले होते.सामान्य माणूस शिक्षण नसल्याने चुकीच्या परंपरेत जखडला गेला होता.त्यातून बाहेर काढण्याचे अलौकिक कार्य संत सज्जनांनी केले.संत तुकाराम महाराजांनी तर अत्यंत खडे सवाल आपल्या अभंग रचनेतून करून गोरगरीब शेतमजूर शेतकऱ्यांची अवहेलना आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या उच्चतम समाजाची खरडपट्टी केल्याचा साक्षात अभंग रचनेतील पुरावा आहे.धर्माच्या नावाखाली कपाळाला मोठमोठे गंध आणि मोठमोठ्या गळ्यात माळा घालून सामान्य माणसाचे शोषण आणि आर्थिक हानी करण्याचा कुणालाच अधिकार नसल्याचे खडेबोल सुनावत आपल्या अभंगातून त्यांनी समतेचा आग्रह धरला.स्वातंत्र्य, समता,बंधुत्व ही मानवी समाजाला संतांनी शिकवण दिली.संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्या पसायदानातून जग सुखी ठेवण्यासाठी दाण मागितल्या चे सर्वश्रुत आहे.आपल्या दैनंदिन जीवन व्यवस्थेमध्ये महाराजांनी आपला उद्योग व्यवसाय शेती करून काबाड कष्टातून जी आर्थिक प्राप्ती केली.अध्यात्म सेवेसाठी त्यांनी अर्पण केली. संत तुकारामांच्या कार्याची दखल घेत नुसते बोलके नव्हे; किंबहुना कृतीतून कार्य दाखवणारे ह.भ.प.रंधवेबापू आदर्शवत कीर्तनकार आहेत. संत ह.भ.प.रंधवेबापू यांनी आपली सत्कार्याची दिशा कायम ठेवली.अशा या खऱ्याखुऱ्या संत सज्जनांच्या साहित्याची जशास तसे पेरणी सद्यस्थितीतील समाजामध्ये करून गोरगरीब,दीनदलित,दुबळ्या,अनाथ,अपंग, शेतमजूर,शेतकरी,वंचित घटकांना मानवी जीवनाचे खरे सुख अध्यात्मात असल्याचे आपल्या ३७ वर्षाच्या हजारो कीर्तन सेवेतून लोक कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवे महाराज सांगत आहेत.यांचे व्यक्तित्व आणि आसामान्य कार्य,अमोघवाणी,पहाडी आवाज,
सेवा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी, सुख शांती आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने उपयोगाची आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपल्या कीर्तन सेवेची विशेष नोंद झालेले आणि एकही पैसा न घेता स्वतःच्या कष्टाच्या पैशाने राज्यभर किर्तन सेवा करून संत भूमीतील राज्यात वेगळा आदर्श निर्माण केलेले बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा पाटोद्याचे रहिवासी ह.भ.प. रंधवेबापुंनी स्वकष्टाचे ३५ लाख रुपये खर्चून पाटोदा येथे विठ्ठलगड संस्थान उभारले आहे.मंदीरात मुख्य विठ्ठल
-रुक्मिणी पावणेपाच उंचीच्या दोन देखण्या मुर्त्या आहेत.
आठ संताच्या मुर्ती आहेत.संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम महाराज,संत एकनाथ महाराज, संत भगवानबाबा,संत वामनभाऊ,संंत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर आणि संत रामचंद्र बोधले महाराज यांचा यात समावेश आहे.शिखर ५१ फुट उंचीचे या शिखरावर सर्व साधुसंताच्या ४८ मुर्त्या, कळस ५ फुट मंदीर २० बाय २० आकाराचे आणि जमीनीपासुन १५ उंचीचे मंदीर या मंदिरासमोर ३६ बाय ३६ आकाराचा आरसीसी कमान डिझाईनसह आकर्षक कीर्तन मंडप उभारला आहे.पालखी मार्ग पैठण -पंढरपुर या मुख्य रत्यालगत उंच टेकडीवर हा विठ्ठलगड उभारला आहे.या संस्थानासाठी चार एकर जमीन आहे.येथे भवीष्यात भक्तनिवास,अन्न छत्र उभारण्याचा रंधवेबापु यांचा संकल्प आहे.पाटोदा शहरातील व परिसरातील भाविकांना अखंड अध्यात्मिक आणि सद् विचार श्रवण करता यावा, लोकांची मनस्थिती ठिक करण्यासाठी रंधवेबापु यांनी हा खटाटोप केला आहे.विठ्ठलगड हे अध्यात्मिक केंद्र बनणार आहे.ह.भ.प.रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या या अमूल्य,
समताधिष्ठित,मानवाभिमुख,
मानवतावादी,न्यायप्रिय आणि बंधुत्व या मूल्यांची शिकवण देणाऱ्या या तत्त्वांना स्मरून त्यांच्या भविष्यातील या राष्ट्रीय प्रमाणिक कार्याला शुभेच्छा..!
-- उत्तम बोडखे,आष्टी.
-----------------------------
0 टिप्पण्या