आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील खडकत को.प.बंधारा क्र.१ व २ तसेच सांगवी
नागपूर व सांगवी सांगमेश्वर येथील सिना नदीवरील बंधाऱ्यांचा एकत्रित जलपूजन समारंभ
आज पार पडला.१४ व १५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिना, कांबळी,कडी,
मेहेकरी आदी नद्यांना पूर आला. परिणामी कडा,धिर्डी,निमगाव चोभा, टाकळसिंग, हिंगणी,
सांगवी आष्टी, खडकत आदी भागातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आउट-फ्लँकिंग होऊन
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतांतील काळी माती वाहून गेल्याने शेतकरी
हवालदिल झाले होते. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना माहिती मिळताच जलसंपदा
मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी २४ सप्टेंबर रोजी खडकत बंधाऱ्याची प्रत्यक्ष
पाहणी केली. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,
मुख्य अभियंता जगताप मॅडम, कार्यकारी अभियंता नखाते व उपअभियंता सिनारे यांना
बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती, गेट दुरुस्ती व नवीन गेट बसविण्याच्या स्पष्ट सूचना
देण्यात आल्या.२० ऑक्टोबर पासून दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले.शासनाच्या
सामाजिक दायित्व निधीतून नाम फाउंडेशनचे कार्याधिकारी गणेश थोरात व मराठवाडा
समन्वयक राजाभाऊ शेळके यांच्या सहकार्याने पोकलेन, टिप्पर व क्रेनच्या साहाय्याने
कामाला गती देण्यात आली. खराब झालेले गेट काढण्यात आले, काही दुरुस्तीसाठी
पाठवण्यात आले तर काही नवीन गेटसाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
सध्या सुमारे ६० ते ७० टक्के नवीन गेट उपलब्ध झाले आहेत.शेतांमधून वाहून गेलेली
काळी माती व मुरूम बाहेरून आणून भरणी करण्यात आली. जवळपास ५०० मीटरपर्यंत गेलेला
भराव पूर्ववत करण्यात आला. २० नोव्हेंबरपासून तीनही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यास
सुरुवात झाली असून आज सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने जलपूजन सोहळा संपन्न
झाला.यामुळे यापुढे शेतीसाठी मुबलक पाणी मिळणार असून पिण्याच्या पाण्याच्या
समस्येवरही मोठ्या प्रमाणात मात होणार आहे. आगामी उन्हाळ्यात या बंधाऱ्यांचे
बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळ सिनारे
(उपभियंता जलसंपदा विभाग), राजाभाऊ शेळके (मराठवाडा समन्वयक नाम फाउंडेशन), अशोक
खेडकर (जि.प.सदस्य कर्जत), नगराध्यक्ष जिया बेग,सरपंच शांतीलाल काटे, संदीप खेडकर,
पोपट शिरोळे (सरपंच पारगाव),गायकवाड (सरपंच सितपूर), दत्ता जेवे, नीलकंठ खेडकर,
बाळासाहेब खेडकर, संतोष जेवे, शकील कुरेशी, बाळासाहेब पवार, गणेश मोकासे, गणेश
जाधव, अशोक कसबे, राम कसबे, अशोक गाडेकर, प्रवीण झांबरे, स्वप्नील जोगदंड,
बाळासाहेब भोस्टे, विजय निंबाळकर, रईस कुरेशी, राजु कुरेशी, वसंत भोसले, महोम्मद
कुरेशी, गणेश मोकासे, संजय जेवे, प्रशांत शिंदे, कल्याण जेवे यांसह खडकत, सांगवी
आष्टी, हिंगणी, बळेवाडी, पारगाव, सितपूर इत्यादी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
---
चौकट
-----------
शेतकऱ्यांच्या भावना आज खडकत, सांगवी
व सितपूर येथील शेतकरी वर्गासाठी आनंदाचा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी
अतिवृष्टीमुळे आमची काळी माती, पीके आणि बंधारे वाहून गेले. यंदा बंधाऱ्यात पाणी
राहील की नाही, अशी भीती वाटत होती. मात्र आ. सुरेश धस आशेचा किरण घेऊन आले. अवघ्या
एका महिन्यात रात्रंदिवस यंत्रसामग्री चालवून बंधारे बुजवले, दुरुस्त केले आणि पाणी
अडवले. आम्हाला शेतकऱ्यांसाठी खंबीर नेतृत्व मिळाल्याचा अभिमान आहे.”
– निशांत जेवे
(शेतकरी)
चौकट
---------
आमचा बंधारा सर्वात आधी उभा राहिला’ ---------------------
“सीना नदीला महापूर आल्याने आमचा बंधारा पूर्णपणे वाहून गेला होता. तीन गावांचे
भवितव्य त्याच्यावर अवलंबून होते. सर्व शेतकरी चिंतेत होते. मात्र आ.धस यांनी नाम
फाउंडेशनशी संपर्क करून ५ पोकलेन आणि १५ हायवा मशीनच्या मदतीने अवघ्या महिन्यात
बंधारा बुजवून पुन्हा पाणी अडवले. आज जलपूजन झाले, हे आमच्यासाठी नवसंजीवनीसारखे
आहे.”

– गणेश जाधव ( शेतकरी)
0 टिप्पण्या